वाटणी
आपल्या प्रतिभेच्या जोरावर पाच वर्षांत वाचकांसाठी पाच कथासंग्रह लिहून प्रकाशित करणार्या श्री. दीपक तांबोळी यांचा हा सहावा कथासंग्रह. भारतीय रेल्वेसेवेत इंजिनियर असणार्या या लेखकाच्या प्रतिभेचं आणि लेखन सातत्त्याचं खरंच कौतुक करावसं वाटतं. दैनंदिन जीवनातल्या, आपल्या आठवणीत साठवलेल्या कौटुंबिक आणि सामाजिक सामान्य घटनांमागे दडलेल्या मानवी वृत्तीचा शोध घेऊन अतिशय संवेदनशील वृत्तीने त्यांनी ह्या कथा लिहिल्या आहेत. नव्हे तर या कथा आपल्या शब्दसामर्थ्याने पुनर्जिवीत करून मानवी मनाला सकारात्मक संवेदनांची साद घातली आहे. कुटुंबापासून समाजापर्यंत धारणा आणि सुधारणांच्या दिशा प्रशस्त केल्या आहेत असे मला वाटते! मी ह्या कथा वाचल्यानंतर मला हे जाणवलं, तसं प्रत्येक वाचकालाही त्या वाचल्यानंतर आपण आपल्याच अनुभूतीच्या वर्तुळात फिरत असल्याचा भास आणि शेवटी त्यातून बाहेर पडून आपलं वृत्त अधिक विस्तृत झाल्याचा आनंद नक्कीच होइल! प्रस्तुत कथासंग्रहात एकूण नऊ कथा समविष्ट आहेत ज्यात क्रमाने पीके, जाणीव, वाटणी, माणसं, जीवनसाथी, पीळ, प्रश्न, तृप्ती, दार्जिलिंग अशी त्यांची शीर्षकं आहेत. (...प्रस्तावनेतून)