वैचारिक साहित्य
विचारवंत आणि सुधारकांचीही जी म्हणून आपणास एक महान, समृद्ध, ज्ञानी परंपरा लाभलेली आहे, त्या परंपरेचा, विचारांचा “प्रकाश” समाजातील सर्व थरांपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य सातत्याने आधुनिक विचारांच्या या संस्कृतीने केले. “हेच खरे समाजाचे धन म्हटले पाहिजे.” वैचारिक संस्कृती ही मुळातच महाव्यापक अशी संस्कृती आहे. या संस्कृतीने समाज “डोळसद्रष्टा” बनवला. “जुने जाऊ द्या मरणालागुनि” हा भाव टाकून देत विज्ञानबोधक नवे भानच ह्या आपल्या वैचारिक संस्कृतीने समाजाला प्रदान केले, ही बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. म्हणूनच जे जे सर्व समाजहिताचे आहे, जे जे लोकहितकारक आहे, जे जे समाज पुढे घेऊन जाणारे आहे त्यांचा “भूमिकानिष्ठ स्वीकार” विचारसंस्कृतीने अगदी सतत केला. हे करताना अनिष्टतेचा धिक्कार आणि जुनाट, बुरसटलेल्या विचारांचा एकंदरीत त्याग करत संविधानमूलक, लोकशाहीहितरक्षक, विज्ञानी, परिवर्तननिष्ठ, विवेकसंपन्न आणि जनहितवादी असलेल्या अशाच बाजूंनी “विचारांची संस्कृती” समाजात सतत उभी रहात आली.