राजर्षी शाहू महाराज : एक सामाजिक क्रांतीचे अग्रदूत
महाराष्ट्रात हे जे स्थित्यंतर घडून आले, त्याचे श्रेय शाहू महाराजांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रबोधनाच्या चळवळीला द्यावे लागेल. शाहू महाराजांची भुमिका केवळ तत्वचिंतकाची नसून कृतीशिल समाजसुधारकाची होती. सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणण्यावर त्यांनी आपले सर्व लक्ष केंद्रीत केले होते. सामाजिक समता व न्याय या तत्वांचा त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर पाठपुरावा केला. अन्याय, अंधश्रध्दा आणि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटून काढल्याखेरीज माणसांच्या विकासाच्या वाटा खुल्या होवू शकणार नाहीत; ह्याची खूणगाठ मनाशी बांधूनच त्यांनी आपल्या क्रांतीकारी कार्याला सुरुवात केली.
शाहू महाराजांच्या सामाजिक क्रांतीकारक कार्याचा आवाका केवळ कोल्हापूर संस्थानापूरता मर्यादित नव्हता. ते केवळ कोल्हापूर संस्थांनाचे छत्रपती राहिलेले नव्हते. त्यांच्या झुंझार व्यक्तिमत्वाची पकड उभ्या महाराष्ट्रावर बसलेली होती.