गाऊ त्यांना आरती
स्वातंत्र्य आंदोलनात महान कार्य करणारे खान्देशचे थोर सुपुत्र धनाजी नाना चौधरी तथा दादासाहेब चौधरी यांनी इंग्रज सरकारची मोठ्या मानाच्या फौजदारकीच्या नोकरीवर पाणी सोडून म.गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झाले. म. गांधी यांच्या विचाराने लढा चालू ठेवायचा तर त्याची सुरुवात स्वतःपासून, कृतीतून करण्यासाठी त्यांनी खादी, शिक्षण, माधुकरी, ग्रामस्वच्छता, अस्पृश्यता निवारण, दरिद्री नारायणाची सेवा, अंत्योदय यासारख्या माध्यमातून केली आणि गांधी मार्गावरील प्रवास आरंभिला. खिरोदा आणि परीसर गांधी विचारांचे व कार्याचे केंद्र बनले. त्यामुळे खिरोदा हे केंद्र इंग्रजांच्या डोळ्यात खुपू लागले, त्यामुळे १४ जानेवारी १९३२ रोजी पोलिसांवर दादासाहेबांना अटक करण्याची वेळ आली. दादासाहेब चौधरी आणि त्यांच्या सहकार्यांच्या कार्याचा परीणाम म्हणजे जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागात अधिवेशन घेण्याचे ठरले तेव्हा फैजपूरची निवड केली गेली. फैजपूर काँग्रेस अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदविला, ज्यांना ज्यांना जे जे शक्य होते ते ते त्यांनी केले. फैजपूर काँगे्रस अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक राष्ट्रीय नेत्यांचे आगमन झाले त्यामुळे जळगाव जिल्हा नव्हे संपूर्ण खान्देशामध्येच एक प्रकारचे भारावलेपण, भारलेपण निर्माण झाले. त्यामुळे फैजपूर काँग्रेस अधिवेशन यशस्वी झाले, फैजपूर काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळाच आयाम प्राप्त करून दिला हे फैजपूर काँग्रेसचे पर्यायाने जळगाव जिल्ह्याचे खूप मोठे योगदान मानावे लागेल.