माझे गाव - माझा इतिहास
गावाचा पूर्वीचा अज्ञात माहितीचा ऐतिहासिक ठेवा नव्या पिढीला ज्ञात व्हावा, हा यामागचा हेतू आहे. तसेच भारतीय मानव आपण केलेल्या कोणत्याही कामाची नोंद ठेवत नाही. परिणामी काळाच्या ओघाने आपले अमूल्य असे कार्य काळाबरोबरच विसर पडत जाते. म्हणून काळाच्या पडद्याआड गेलेल्या घटना मांडून आपलाच गौरवशाली इतिहास समाजापुढे ठेवण्याचा माझा हेतू आहे. गावातील समाजजीवनाचे सूक्ष्म व प्राथमिक चित्र रेखाटायचे असल्यास ग्रामीण जीवनाला केंद्रिभूत स्थान देण्याशिवाय गत्यंतर नाही. कदाचित यामुळेच गांधीजींनी भारतीय मनाची पकड समजून घेताना आपल्या अनुयायांना ‘खेड्याकडे चला’ असा मंत्र दिला होता. ग्रामजीवनाचा अनुभव घेऊन परस्पर सहकार्य भावना वृद्धिंगत होताना दिसावी, तसेच आदर्श व सुजाण नागरिकत्वाकडे त्यांची वाटचाल व्हावी, हा उदात्त हेतू आहे.