शेतकरी आत्महत्या : एक चिंतन
ब्रिटीशांच्या काळापासून सुरू झालेले शेतकर्यांचे शोषण स्वातंत्र्यानंतर थांबेल व कृषी क्षेत्राला सोनेरी दिवस येतील, या भाबड्या आशेवर भारतीय शेतकरी आजच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जगत आहे. पण शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्या या आशेवर पाणी फिरल्याने तो आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलत आहे.भारतासारख्या कृषिप्रधान देशात होणार्या शेतकरी आत्महत्यांचे वाढते आकडे ही देशाच्या भविष्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. याविषयासंबंधी माहिती गोळा करावी आणि त्यावर काही उपाययोजना करावी या हेतूने शासनही विविध विकासयोजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. पण या योजना शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी कितपत प्रभावी ठरल्या आहेत, यात मात्र शंकाच आहे. ज्या शेती व्यवसायावर इतर सारा विकास अवलंबून आहे; जो शेतकरी शेतात राबतो म्हणून आपणास अन्न मिळते, तो शेतकरी राजा स्वतःच्या जीवाचा, कुटुंबाचा विचार न करता एवढा टोकाचा निर्णय कसा घेऊ शकतो? स्वतःला संपवताना त्याला परत एकदा विचार करावासा का वाटत नाही? स्वतःला संपवून त्याच्या कुटुंबाच्या समस्या संपतात का? त्याला त्याच्या या आत्महत्येच्या निर्णयापासून कसे परावृत्त करता येईल? या सार्या प्रश्नांची उकल शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केलेला आहे.