पांगल्या पायवाटा
पांगल्या पायवाटा या काव्यसंग्रहातून कवी तुकाराम पाटील यांनी गाव गाड्याचे आणि कास्तकाराचे वर्तमान वास्तव दर्शन घडविले आहे.ऐसपुरीच्या हरविल्याने सैरभैर झालेला कास्तकार हा जगाचा पोशिंदा म्हणून फक्त लिहिण्यापुरता उरला ही त्याची वेदना वाचकाला अंतर्मुख करते. आपल्याशी आपला संवाद कवी जेव्हा सादू लागतो तेव्हा पेरावे काय?हा जीवघेणा प्रश्न उभा राहतो. कारण अस्मानी सुलतानी संकटाने उध्वस्त होणारी शेती आणि त्यातून कास्तकाराची होणारी वाताहात.त्यामुळे त्याचे मन पिळवटून निघते.आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणे आणि झुरणे फक्त हाती राहते.बारोमासच्या जोखडातून सुटका नाही याची जाणीव असतानाही ज्या काळ्या वावरात कैक पिढ्यांचा घाम जिरला ते वावर त्याला सोडवत नाही.शिवार हा त्याच्या सुखदुःखाचा सोबती आहे.बहरल्या पिकात देव पाहणे आणि मुक्तीचे ठिकाण व स्वर्ग शेतात गवसणे ही कास्तकाराची श्रद्धा कवी तुकाराम पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे.कवीची कविता ही निखळ, निश्चल, पारदर्शी थेट हृदयाला भिडणारी आहे.अंत प्रतिभेतून पाझरणार्या काव्यभाषेला उंडारल्या , आभूट, चोंबड्या, आखर खुटाबंदी सारखे अस्सल ग्रामजीवनाच्या मातीतून आलेले शब्द आशय घन आणि सौंदर्यात्मक प्रतिमा सृष्टी देऊन जातात. कवीच्या मनाच्या तळाशी रूतून बसणारे वेदनाप्रत्ययी झरे, करुणार्त प्रत्ययांचे अंत:र्मनात कोसळणारे जीवघेणे धबधबे, पांगल्या पायवाटांनी मनाला बसणारे हादरे या सर्वांचा खोल प्रत्यय या कवितेतून येतो.ही कविता गाव खेड्यातल्या मरणासन्न जगात जगण्याच्या आशेची ज्योत तेवत ठेवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करते. हा प्रामाणिक उद्गार संत कवी तुकोबारायांच्या अभंग काव्यकुळाशी आपलं नातं अधोरेखित करतो.
- प्रा. डॉ. तुषार चांदवडकर