जीवनसार-सूत्र
मानवी जीवन सुख-दुःखांनी व्यापलेले आहे. सुख-दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या कर्मानुसार येते. कर्म करताना आपण बर्याच वेळेस गोंधळून जातो. त्या गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला आपल्या नात्यांचा, संस्कारांचा, संयमाचा विसर पडतो. आपल्या जीवनात काही मूल्ये असतात. ती आपण जोपासत नाही. त्यामुळे आपले जीवन आपण संभ्रमावस्थेत जगतो. त्या जगण्याला कुठेतरी आधार मिळावा, यासाठी प्रसन्नतेचे स्वरूप काय असते. जीवनात संयमी कधी राहावे. नात कसं जपावं, परोपकार करणे हेच पुण्याचं काम आहे. मरणाला न घाबरता ते कसे मंगलमय असते, आनंद आपल्यातच कसा शोधावा, भावनेपेक्षा कर्तव्य किती महान असते, शब्द कधी अस्त्र बनतात तर कधी फुले बनतात, याचा परिचय करून घ्यायचा म्हणजे आत्मशोधाचा मार्ग निवडायचा. स्वयंशिस्तीने जगणं काय असते. शाश्वत सुख आत्मानुभूतीतून कसे प्राप्त होते, या सर्व विषयांचा ऊहापोह या ‘जीवनसार सूत्र’ पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.